Vasmat-Parbhani accident: वसमत-परभणी मार्गावर तेलगाव पाटीजवळ २२ एप्रिलला दोन युवकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवर बकराने उडी मारल्याने अपघात घडला.
हट्टा (Vasmat-Parbhani accident) : वसमत - परभणी मार्गावरील तेलगाव पाटीजवळ २२ एप्रिल गुरूवार रोजी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर (नांदुसा) येथील नितीन नागोराव नरवाडे व कपिल हीरामन हटकर हे दोघे परभणी येथील दर्गाह कंदुरीसाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीवर बकराही नेण्यात येत होता. दरम्यान, सकाळी सुमारे १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास तेलगाव पाटीजवळ अचानक बकराने उडी मारल्याने चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. याच वेळी समोरून येणार्या दुसर्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुसर्या दुचाकीवर शेख सिराज शेख उमर, त्यांची पत्नी गौसियाबी व मुलगा शेख सुजात (रा. बऊर, ता. कळमनुरी) प्रवास करत होते.
या (Vasmat-Parbhani accident) भीषण अपघातात नितीन नागोराव नरवाडे (रा. नांदुसा, ता. अर्धापूर, जि. नांदेड) व शेख सिराज शेख उमर (रा. बऊर, ता. कळमनुरी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कपिल हीरामन हटकर, गौसियाबी व शेख सुजात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.