Udgir shop fire: जळकोट रोडवर गुरुवारी सकाळी आग लागून सहा दुकाने जळून गेल्याचे उदगीरमध्ये घटना. उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यावरही तासभर वाघावत्या आगीचा नियंत्रण
दिव्यांग दुकानदार सुभाष पुन्नमवार यांच्यासह व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
अग्निशमन दल तासभर उशिरा पोहोचल्याचा नागरिकांचा आरोप
उदगीर (Udgir shop fire) : उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पत्र्याच्या दुकानांना गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागून सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत तीन किराणा दुकाने, पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांट, दुचाकी दुरुस्ती गॅरेज आणि चिकन शॉप अशी एकूण सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उदगीर शहरातील जळकोट रोडवरील आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास एका दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले. कांही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी परिसर व्यापला गेला. (Udgir shop fire) आगीच्या ज्वाला आणि धुरांच्या लोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत दिव्यांग किराणा दुकानदार सुभाष पुन्नमवार यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक वर्षांच्या कष्टातून उभा केलेला त्यांचा किराणा व्यवसाय काही मिनिटांतच राख झाला. दुकानातील संपूर्ण माल, फर्निचर, रोख रक्कम व इतर साहित्य जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचप्रमाणे इतर व्यापाऱ्यांच्याही दुकानांतील माल पूर्णपणे जळून गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. तथापि, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास जवळपास एक तासाचा विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी (Udgir shop fire) आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बहुतांश दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, व्यापाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारे हे नुकसान अत्यंत मोठे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आगीचे कारणाची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करुन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.