गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटीजवळ दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना रविवार (१६ मे) रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली.
दुचाकींचा तिहेरी अपघात झाल्याची चर्चा; पालम रस्त्यावर काम सुरू असल्याचे सूचना फलकच गायब
परभणी (Triple Bike Accident) : गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटीजवळ दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना रविवार (१६ मे) रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. पालम रस्त्यावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक गायब असल्यामुळे तीन दुचाकींचा तिहेरी अपघात झाल्याची चर्चा आहे. नांदेड–पुणे महामार्गावर पालम ते गंगाखेड व परळी दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नांदेड–पुणे महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देण्याची मागणी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेडहून पालम तालुक्यातील रोकडेवाडीकडे जात असलेल्या दुचाकीला पालम रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या पोत्याला धक्का लागला. यामुळे चालक नागेश विष्णू निळे (वय ४०) हे दुचाकीसह रस्त्यावर पडून जखमी झाले. त्याचवेळी पालम रस्त्याने गंगाखेडच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीही रस्त्यावर पडलेल्या दुचाकीवर आदळल्या. यात सौरभ माधवराव बचाटे (वय २०), सचिन अनंता कदम (वय २५) व देवराव शामराव चव्हाण (वय १७, सर्व रा. वडगाव स्टे., ता. सोनपेठ) हे तिघे जखमी झाले.
एक दुचाकी पडल्यानंतर त्यावर दोन दुचाकी आदळल्याने तिहेरी अपघात झाल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये होती. अपघाताची माहिती मिळताच प्रणित खजे, लक्ष्मण साबणे, राष्ट्रपाल साबणे, भैय्या व्हावळे यांच्यासह मरडसगाव पाटीवरील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हनुमान इंगळे व भागवत दुधाटे यांच्या रुग्णवाहिकेतून चारही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. पी. आर. चट्टे, डॉ. कैलास चांदकर, डॉ. योगेश मल्लूरवार, परिचारिका संगिता लटपटे, माया लाटे, भारत भदर्गे, भिमा राठोड आदींनी जखमींवर प्रथमोपचार केले. यापैकी सौरभ बचाटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले, तर देवराव चव्हाण व सचिन कदम यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे.
नांदेड–पुणे महामार्ग ठरतोय अपघाताचा सापळा
गंगाखेड तालुक्यातून जाणाऱ्या नांदेड–पुणे महामार्गावर गंगाखेड–पालम व गंगाखेड–परळी दरम्यान दोन्ही दिशांनी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कामाच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक नसल्याने या मार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.
पालम ते गंगाखेड व गंगाखेड ते परळी दरम्यानचा हा महामार्ग अपघाताचा सापळा ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देऊन कामाच्या ठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टर बसविण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावेत, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.