बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध हातभट्टीची गावठी दारू आणि मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या विषारी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
'किसान ब्रिगेड'चे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन; अवैध दारू व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाईची मागणी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध हातभट्टीची गावठी दारू आणि मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या विषारी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 'किसान ब्रिगेड'चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. साहेबराव मोरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सविस्तर निवेदन देत कठोर आणि कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ग्रामीण भागातील शेतकरी, हायस्कूलचे शिक्षक आणि समाजसेवक यांच्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

१६ ते २१ वयोगटातील विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात
निवेदनात म्हटले आहे की, हायस्कूल आणि महाविद्यालयात शिक्षण घेणारे १६ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थी विषारी दारूच्या आहारी जात आहेत. ग्रामीण भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही लोक बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करत असून अधिक नफा मिळवण्यासाठी त्यामध्ये घातक रसायने मिसळून विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनातील धक्कादायक आकडेवारी
निवेदनात मांडण्यात आलेल्या माहितीनुसार,
- १० ते १२ टक्के विद्यार्थी आणि ४० ते ४५ टक्के नागरिक विषारी दारूच्या सेवनामुळे प्रभावित होत आहेत.
- विषारी दारूमुळे प्रत्येक गावात दरवर्षी सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- दारूच्या नशेत वाहन चालवल्यामुळे भीषण अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- दारूच्या व्यसनामुळे नैराश्य वाढून अनेक नागरिक आत्महत्या करत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आत्महत्यांच्या नोंदीबाबत गंभीर आरोप
निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दारूच्या व्यसनामुळे किंवा नशेत आत्महत्या करणाऱ्या काही व्यक्तींच्या मृत्यूची नोंद 'शेतकरी आत्महत्या' म्हणून करण्यासाठी नातेवाईकांकडून महसूल प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अशा वादग्रस्त प्रकरणांची संख्या वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनावरही आरोप
ग्रामीण भागात कोण दारू तयार करतो आणि विक्री करतो याची माहिती स्थानिक पोलिसांना असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, ठरावीक हप्त्यांमुळे संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही ॲड. साहेबराव मोरे यांनी केला आहे.
कायमस्वरूपी कारवाईची मागणी
अवैध दारू व्यवसायावर केवळ तात्पुरती किंवा दिखाऊ कारवाई न करता तो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख समाजसेवकांची विशेष समिती स्थापन करून त्यांचा अहवाल मागविण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
या मोहिमेत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि गावागावांतील शाळा समित्यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.