दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१(सी) वर भुलाई ते भांडेगाव या गावांच्या मधात टोलनाका उभारला गेला.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
यवतमाळ (Toll Plaza Issue) : दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१(सी) वर भुलाई ते भांडेगाव या गावांच्या मधात टोलनाका उभारला गेला. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या या टोलनाक्याचे लोकेशनच चुकलेले आहे. त्यांच्याकडून घेतला जाणारा टोल हा जनसामान्यांवरील भुर्दंड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर आज २७ मार्चला पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुढाकार घेत आंदोलकांसोबत बैठक घेतली. पालकमंत्री ना.राठोड यांनी लोकआग्रह लक्षात घेता, हा टोलनाका बंद करण्याचे निर्देश दिले असून एनएचआयला प्रस्ताव पाठविल्यानंतर वादग्रस्त टोलनाका बंद होणार आहे.
राहुल ठाकरे यांनी बैठकीत मांडले अभ्यासू मुद्दे
दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१(सी) वर भुलाई ते भांडेगाव या गावांच्या मधात टोलनाका वादग्रस्त ठरला. काँग्रेससह उद्धव बाळासाहेब शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व इतर मित्रपक्षांनी हा टोलनाका अत्यंत चुकीचा असल्याने या भागातील वाहनधारकांची होणारी लूट पाहून आक्रमक आंदोलने केली. आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी बैठकीला आंदोलनकर्ते काँग्रेसचे राहुल ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, पंढरीनाथ सिंहे, सैय्यद फारूक, कैलास कटके, अतुल राऊत, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकरे, अजय ठाकरे, ज्ञानेश्वर खोडे, अजय गाडगे, अँड. मनोज कावळे, संजय महल्ले, गजानन बिबेकर, मसूद अहेमदखान, अजिमशहा, संजय शेळके, प्रमोद ठाकरे उपस्थित होते. यावेळी टोलनाक्यासंदर्भातील मुद्दे उपस्थित करताना राहूल ठाकरे यांनी दारव्हा ते भांडेगावपर्यंत या महामर्गाचे १० टक्के काम झाल्याचे निदर्शनात आणून दिले.नियमानुसार नगरपरिषदेच्या हद्दीपासून १० किमी अंतरावर टोल नाका असावा लागतो. मात्र हा टोल ७ किमी अंतरात आहे. एका टोलनाक्याचे अंतर ६० किमीचे असते. मात्र ४५ किमी अंतरावर हा टोलनाका उभारल्या गेला. एनएचआयच्या नियम २००८ मधील मुद्देही यावेळी पालकमंत्र्यांपुढे मांडले.
प्रस्ताव जाईपर्यंत टोल न घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांनी अकोला राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांसह एनएचआय व इतर अधिकार्यांनाही जाब विचारला. यावेळी मुद्दे लक्षात येताच पालकमंत्र्यांनी एनएचआयकडे प्रस्ताव पाठवून हा टोल बंद करण्याची सूचना केली. इतकेच नाही तर प्रस्ताव जाईपर्यंत कुठलाही टोल घेऊ नये असे निर्देश दिले. त्याचबरोबर आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हेही मागे घेण्याची सूचना त्यांनी पोलीस विभागाला केली.
ना. नितीन गडकरींची भेट घडविण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
भुलाई-भांडेगाव या गावांच्या मधातील कारंजा रोडवरील टोलनाका योग्य पोझिशनवर घेतलेला नाही हे स्पष्ट होते. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची लवकर तारीख घेऊन त्यांना भेटू. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकरे व इतरही काही आंदोलकांना या भेटीसाठी सोबत नेऊ अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
लोकांच्या सक्रिय आंदोलनाचे यश : राहुल ठाकरे
आघाडीच्या आंदोलनाला एक मोठे यश मिळाले आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी या दोघांचेही आंदोलक या नात्याने आम्ही आभारच मानू असे म्हणत लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका चांगली असल्याची प्रतिक्रिया जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी दिली.