मुंबई व परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असतानाही राज्यातील विविध भागांतून हजारो शिक्षक मुंबईत दाखल झाले.
"अनुदानित व्यवस्था संपवण्याचा घाट" – संचमान्यतेला घातक निकषांचा आधार : आंदोलनकर्त्यांचा आरोप
मुंबईत महासंघ व विज्युक्टाचे धरणे आंदोलन संपन्न
मुंबई व परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असतानाही राज्यातील विविध भागांतून हजारो शिक्षक मुंबईत दाखल झाले आणि प्रचंड पावसात आझाद मैदानावर ऑनलाइन संचमान्यतेच्या घातक निकषांविरोधात धरणे आंदोलन केले.
महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, विज्युक्टाचे अध्यक्ष तथा महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव तथा महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप शितोळे, प्रा. रवींद्र पाटील आणि प्रा. सुनील पूर्णपात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंदोलनस्थळी आमदार मनीषा कायंदे, आमदार सुधाकर अडबाले तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीष महाजन यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
आंदोलनकर्त्यांनी यावेळी आरोप केला की, शिक्षण व शिक्षकांचे अनेक प्रश्न राज्यात प्रलंबित असून शासनाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. ऑनलाइन संचमान्यतेच्या निकषांच्या आडून अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मंत्री गिरीष महाजन यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
- शासन आदेशानुसार ग्रामीण व आदिवासी भागात 20/30 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करावी.
- शासन आदेशानुसार 15 मुली ही संख्या तुकडी टिकवण्यासाठी ग्राह्य धरावी.
- शिक्षार्थ कपातीची तरतूद कायम ठेवून तुकड्या अनुदानासाठी पात्र ठेवाव्यात.
- शाखा, माध्यम व तुकडीनुसार कार्यभार ग्राह्य धरावा.
- प्रात्यक्षिकासाठी 20 विद्यार्थ्यांची बॅच ग्राह्य धरावी.
- वरिष्ठ महाविद्यालय संलग्न 45 मिनिटांची तासिका कायम ठेवावी.
- मान्यता विषयाच्या शिक्षकाला त्याच विषयाचा कार्यभार देण्यात यावा.
- पर्यावरण विषयाचे वाटप प्रचलित पद्धतीनुसार करावे.
- ऑनलाइन प्रवेशित सर्व विद्यार्थी ग्राह्य धरावेत.
- संयुक्त तुकडीचा कार्यभार गणनेत समाविष्ट करावा.
- भाषा विषयाच्या स्वाध्याय तासिकेसाठी 40 विद्यार्थ्यांमागे एक स्वाध्याय तासिका आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी दुसरी तासिका कार्यभार गणनेत समाविष्ट करावी.
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, विद्यार्थी संख्येच्या निकषाच्या आधारे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आवश्यक असल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
आंदोलनात प्रमुख उपस्थित
या आंदोलनात डॉ. अभिजीत पोटले, प्रा. अनिल काळे, डॉ. चेतन हिंगणेकर, डॉ. नितीन देवतळे, प्रा. राजा वामन, प्रा. शंकर लहाने, प्रा. परेश देशमुख, प्रा. विशाल टेंभे, प्रा. विष्णु फुले, प्रा. भूषण मुंदाणे, प्रा. चंद्रकांत येसनसुरे, गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कटरे, प्रा. जागेश्वर भेंडारकर, प्रा. संजय कळंबे, प्रा. टी. एस. बिसेन, प्रा. गौतम सर आणि प्रा. लांजेवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
