बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उचलीच्या पैशांच्या वादातून मुकादमावर अपहरण व छळाचे आरोप; पीडितावर अतिदक्षता विभागात उपचार, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
बीड : बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देवीदास कापसे यांचे अपहरण करून त्यांना सलग चार दिवस एका अज्ञात ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आले. या काळात त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका करून अमानुष वागणूक दिल्याचा गंभीर आरोप संबंधित मुकादमावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
देवीदास कापसे हे उमापूर (ता. गेवराई) येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांनी घेतलेल्या उचलीच्या पैशांवरून मुकादम गणेश थोरात याच्याशी त्यांचा वाद झाला होता. या वादातून "उचल परत का दिली नाही?" या कारणावरून गणेश थोरात आणि त्याच्या साथीदारांनी देवीदास यांचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अपहरणानंतर आरोपींनी देवीदास यांना एका अज्ञात ठिकाणी ठेवून चार दिवस अन्न-पाण्याविना ठेवले. या काळात त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. शारीरिक छळासोबतच मानसिक त्रास देण्यासाठी त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
देवीदास बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत आरोपींकडून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर चार दिवसांनंतर देवीदास यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना गावी आणण्यात आले.
सुटकेनंतर त्यांच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात गेवराई पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देवीदास यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या वृद्ध आईने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आणि त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईवरही टीका होत आहे.
घटनेनंतर कापसे कुटुंब भीतीच्या वातावरणात असून मुख्य आरोपी गणेश थोरात आणि त्याच्या साथीदारांविरोधात अपहरण, बेकायदेशीर कैद, अमानुष मारहाण तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.