Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Special Intensive Revision

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमात सुधारणा करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.


महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर २७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध

Special Intensive Revision |

हिंगोली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमात सुधारणा करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख धरून हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार असून आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांना यासंदर्भात लेखी सूचना पाठवली आहे.

यापूर्वी १४ मे २०२६ आणि १५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशांनंतर तसेच राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या विनंतीनुसार आयोगाने हे नवीन वेळापत्रक मंजूर केले आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात झाली आहे. याअंतर्गत बीएलओ (Booth Level Officer - BLO) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणी व पडताळणी करणार आहेत. ही प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. याच दिवशी मतदान केंद्रांचे युक्तीकरण तसेच आवश्यक असल्यास मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येणार आहे.

मतदार यादीचा मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना आपली नावे तपासता येतील. तसेच काही त्रुटी अथवा बदल असल्यास दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.

या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित मतदारांना लेखी सूचना देणे तसेच त्यांची बाजू ऐकून घेण्याचाही समावेश असेल.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच यादी पुढील निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांना सुधारित कार्यक्रमाची माहिती राज्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून सामान्य मतदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याबरोबरच राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात माहिती देऊन सहकार्य करण्यास सांगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हा आदेश आयोगाचे उपसचिव संदीप कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करून पारदर्शक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करणे, हा या विशेष सघन पुनरिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ३० जून २०२६ – विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेला प्रारंभ
  • १७ ऑगस्ट २०२६ – बीएलओ पडताळणी व मतदान केंद्र युक्तीकरण पूर्ण
  • २४ ऑगस्ट २०२६ – मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध
  • २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
  • २२ ऑक्टोबर २०२६ – दावे व हरकतींचा अंतिम निपटारा
  • २७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Related to this topic: