कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतीची कामे सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका विवाहित शेतकरी महिलेचा विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला.
कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारातील घटना; दोन लहान मुलांवरून आईचे छत्र हरपले
हतनूर (Snake Bite) : कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतीची कामे सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका विवाहित शेतकरी महिलेचा विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला. मिरचीची लागवड करत असताना मल्चिंग पेपरखाली लपून बसलेल्या सापाने दंश केल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी घडली.
मृत महिलेचे नाव रोहिणी सतीश नागोडे (वय २३, रा. शिवराई, ता. कन्नड) असे आहे. त्या सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजता आपल्या शेतात मिरचीची लागवड करत होत्या. याचवेळी मल्चिंग पेपरखाली दडलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर त्या बेशुद्ध पडल्या.
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कन्नड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
रोहिणी नागोडे यांच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा, अकरा महिन्यांचे बाळ तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता शिवराई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून संपूर्ण शिवराई गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.