सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत संघर्ष समितीची सकारात्मक चर्चा
हिंगोली (Siddheshwar Dam) : सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी गरुड तसेच जिल्हा अभियंता विक्रम पत्की उपस्थित होते. समितीच्या प्रतिनिधींनी केळी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी ठाम भूमिका समितीने मांडली.
याशिवाय, तलावाच्या पाणी हक्कासंदर्भातील विविध मुद्द्यांवर तसेच भविष्यातील पाणी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पाणी हक्काच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक असून शेतकरी व नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीस केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीचे बी.डी. दादा बांगर, विलास आघाव, निवासपाटील सांगळे, सरपंच बालाजी सांगळे, अमोल सांगळे, एकनाथ नागरे, रामजी घुगे, दिनकर खिल्लारे, भास्कर आघाव, सोपान आघाव आणि शुभम सांगळे उपस्थित होते.
केळी पाझर तलावाच्या पाणी हक्कासाठी एकजुटीने व सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.