पक्ष बदलण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण वाटत असला, तरी राजकीय परिस्थितीचा विचार करता तो योग्य ठरू शकतो
'भावनिकदृष्ट्या निर्णय कठीण, पण राजकीयदृष्ट्या योग्य'; २० जूननंतर अंतिम निर्णय घेण्याचे संकेत
(Shiv Sena Split) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पक्ष बदलण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण वाटत असला, तरी राजकीय परिस्थितीचा विचार करता तो योग्य ठरू शकतो, असे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय २० जूननंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, पक्षांतराचा विचार करताना आपण मोठ्या द्विधा मनःस्थितीत आहोत. भावनिक पातळीवर हा निर्णय चुकीचा वाटतो, मात्र राजकीय वास्तवाचा विचार केला असता तो योग्य असल्याचे जाणवते. खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांना निवडून आणता येत नसेल, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मतदारसंघाच्या विकासकामांबाबत बोलताना निंबाळकर यांनी रस्ते, पूल, डीपी यांसारख्या कामांसाठी सातत्याने प्रस्ताव देऊनही अपेक्षित मंजुरी मिळत नसल्याचे सांगितले. सत्तेचा आणि विकासनिधीचा अभाव असल्यामुळे जनतेची कामे पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. मात्र, वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या तसेच वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावत, हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने असल्याचा दावा केला.
महायुतीच्या नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. हे दोन्ही नेते सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये फिरून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे मर्यादा असल्या तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहण्याची गरज होती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसल्याचे सांगितले. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मुंबईत होणाऱ्या आमदार, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असेही कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.