नांदेड (Senior Citizens Rights) : “ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हाच खरा राष्ट्राभिमान” असा ठाम संदेश देत, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संघ ‘फेस्कॉम’ (नांदेड) च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांना विविध प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली उपेक्षा थांबवून शासनाने तातडीने ऐतिहासिक निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभरात तीव्र निषेध मोर्चे व आंदोलने छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी दिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सद्यस्थितीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, ज्यांनी राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्यात आयुष्य वेचले, आज तेच ज्येष्ठ नागरिक उपेक्षा, आर्थिक असुरक्षितता आणि मानसिक वेदना सहन करत आहेत. साठ वर्षांनंतर शरीर साथ देत नसल्याने अनेक जण काम करण्यास असमर्थ ठरतात. कुटुंबातील बदलत्या मानसिकतेमुळे अनेकांना स्वतःच्या घरातच उपेक्षित जीवन जगावे लागत असून, दोन वेळची भाकर, चहा आणि औषधपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
शासनाने तातडीने मानधन व इतर सुविधा सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिक कुटुंबावरचे ओझे न राहता त्यांना आदराची वागणूक मिळू शकेल. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षेच ग्राह्य धरून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लागू करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित २००७ चा कायदा, २०१० चे नियम आणि २०१३ चे पारित धोरण व कायदा यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळची रोटी, चहा व औषधपाण्यासाठी दरमहा किमान ५ हजार रुपये मानधन देणारी “मुख्यमंत्री ज्येष्ठ लाडके मायबाप योजना” तात्काळ सुरू करावी. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बस आणि हवाई प्रवास विनामूल्य, सुरक्षित व आरक्षित करण्यात यावा. तसेच त्यांना संपूर्ण मोफत आरोग्य विमा व आरोग्य कवच शासनाने उपलब्ध करून द्यावे.
ज्येष्ठ नागरिकांना करमुक्त दर्जा देण्यात यावा. तसेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र “ज्येष्ठ नागरिक मंत्रालय” स्थापन करावे. विधान परिषद व राज्यसभेत ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे प्रतिनिधित्व देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी, यासह इतर विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, सचिव प्रभाकर कुंटूरकर आणि कोषाध्यक्ष गिरीश बाराहळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.