सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
रायगड (Scorpio Accident) : सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर घाटातील भयावह दृश्य समोर आले असून संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसगाव येथील काही तरुण दापोली तालुक्यातील हर्णे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री मजामस्ती करून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटले. घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावरून वाहन थेट खोल दरीत कोसळले.
अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ पूर्णपणे काळीकुट्ट आणि चिरडलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनास्थळी काही मृतदेह वाहनापासून अवघ्या पाच फुटांच्या अंतरावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते. घाटातील अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसर यामुळे बचावकार्य करताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सोमवारी सकाळपर्यंत काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25), सुहास जितेंद्र लोखंडे (20), अंश समीर चव्हाण (18), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), अनिल अभिमन्यू शिंगटे (25) आणि नितीन किसन नायकोंडे (35) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती साताऱ्यात पोहोचताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.