Jamb Marg tree felling: सावरखेड ते पाचरण जांब मार्गावरील वृक्षतोड, वृक्ष चोरी व जंगलातील आगीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडला आहे. स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नाकेबंदीची नागरिकांची मागणी
पातूर (Jamb Marg tree felling) : सावरखेड ते पाचरण जांब या ग्रामीण मार्गावरील जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व वृक्ष चोरी सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडील काही दिवसांत या परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत अनेक वनस्पती, झाडे तसेच वन्यजीव व पक्ष्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलातील जैवविविधतेवर याचा गंभीर परिणाम होत असून भविष्यात पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस काही संशयास्पद वाहनांची ये-जा वाढली असून या वाहनांद्वारे बेकायदेशीरपणे लाकूड वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या मार्गावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. सावरखेड येथून जंगलात प्रवेश करताना एक नाका उभारण्यात यावा, तसेच पाचरण जांब बाजूने येणाऱ्या मार्गावरही स्वतंत्र नाकेबंदी करण्यात यावी. या (Jamb Marg tree felling) दोन्ही ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस कडक तपासणी करूनच वाहनांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.
तसेच, जंगलातील आग नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करणे, गस्त वाढवणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.