जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जालन्यात धक्कादायक दुर्घटना
जालना (Samruddhi Expressway Accident) : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. महामार्गाची सफाई करणाऱ्या महिला कामगारांनी काम आटोपल्यानंतर आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याचवेळी मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या चार जणांना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांमध्ये कडूबाई मदन, ताराबाई चौधरी, लक्ष्मीबाई मदन, अलका आदमाने, मीना आदमाने आणि कांचन आदमाने यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महिनाभरापूर्वीच करमाडजवळ अशाच प्रकारच्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.