मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना टळली.
ATC च्या तत्काळ सूचनेनंतर AI816 चे टेकऑफ रद्द; सुरक्षा तपासणीनंतर पर्यायी प्रवास व्यवस्था
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दोन विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून वेळेत मिळालेल्या निर्देशांनुसार एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ प्रक्रिया तातडीने थांबवली आणि संभाव्य अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता घडली. सिलीगुडीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगनंतर अद्याप धावपट्टी रिकामी करत असतानाच मुंबईहून दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे AI816 विमान त्याच धावपट्टीवरून उड्डाणासाठी सज्ज झाले होते.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीसीच्या सूचनेनंतर AI816 विमानाच्या कर्मचाऱ्यांनी टेकऑफ रन तात्काळ रद्द केला आणि विमान पुन्हा पार्किंग क्षेत्रात आणण्यात आले. यानंतर मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) विमानाची आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे एअरलाइनने स्पष्ट केले.
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७ जुलै रोजी मुंबई- दिल्ली मार्गावरील AI816 विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या निर्देशानुसार टेकऑफ रन थांबवून विमान परत बेमध्ये आणले. प्रवाशांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
सामान्यतः 'टेकऑफ रन' म्हणजे विमानाने उड्डाणासाठी आवश्यक वेग मिळवण्यापूर्वी धावपट्टीवर धावण्याची प्रक्रिया होय.
या घटनेवेळी दोन्ही विमानांमध्ये किती प्रवासी होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, नेमके कारण काय होते, याची चौकशी सुरू असून सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच संबंधित विमान पुन्हा सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे एअरलाइनने स्पष्ट केले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावर दररोज ९५० हून अधिक टेकऑफ आणि लँडिंग होतात. व्यस्त दिवशी ही संख्या १,००० पेक्षाही अधिक असते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी या विमानतळाने २४ तासांत १,०३६ विमान हालचालींचा विक्रम नोंदवला होता.
मुंबई विमानतळावर 09/27 आणि 14/32 अशा दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेद देत असल्याने दोन्ही धावपट्ट्यांवर एकाच वेळी नियमित उड्डाणे आणि लँडिंगची प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात विमानतळ एका वेळी एकाच धावपट्टीप्रमाणे कार्यरत असतो.
विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगची वेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सेकंदांच्या अचूकतेने नियंत्रित करते. धावपट्टी, टॅक्सीवे आणि वाऱ्याच्या दिशेवर सतत लक्ष ठेवले जाते. कोणताही संभाव्य धोका निर्माण झाल्यास टेकऑफ थांबवणे किंवा विमानाला 'गो-अराउंड' करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.
यापूर्वी जून महिन्यात अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवेवर समोरासमोर आली होती. त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये सुमारे २०० मीटरचे अंतर राहिले होते आणि वेळेत कारवाई करून संभाव्य अपघात टाळण्यात आला होता.