नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कामामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या नदीपात्राचा कायापालट होताना दिसत आहे.
चिखली (River Deepening Project) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखली नगर परिषदेने शहरातील नालेसफाई, स्वच्छता आणि पूरनियंत्रणाच्या कामांना वेग दिला असून जामवंती नदीच्या स्वच्छता व खोलीकरण मोहिमेमुळे शहरात सकारात्मक बदलाची चाहूल लागली आहे. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कामामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या नदीपात्राचा कायापालट होताना दिसत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी नगर परिषद निवडणुकीच्या काळात शहरातील स्वच्छता, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. जनतेला दिलेल्या त्या शब्दाला जागत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर स्वच्छतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आमदार महाले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विविध विकासकामे राबवत असून त्यामध्ये नालेसफाई आणि जामवंती नदीचे खोलीकरण हे महत्त्वाचे काम ठरत आहे.
शहराच्या पश्चिम भागातून वाहत येणारी जामवंती नदी जुन्या गावाला वळसा घालत पुढे प्रवाहित होते. गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्रात गाळ, कचरा, झाडाझुडपे आणि अडथळे निर्माण झाल्याने पावसाळ्यात नदीची वहनक्षमता कमी होत होती. त्यामुळे जुन्या गावातील काही भाग, माळीपुरा आणि इतर सखल वस्त्यांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत असे. या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी नदी स्वच्छता आणि खोलीकरणाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू असून नदीचे पात्र पूर्वीपेक्षा अधिक रुंद आणि खोल केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार असून पूरस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख नाले आणि गटारांची साफसफाईही प्राधान्याने केली जात आहे.
विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर लोकनियुक्त नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात आहेत. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत कामांची नियमित पाहणी सुरू ठेवली आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून विविध स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार यांनीदेखील या कामाचे स्वागत करत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांच्या हितासाठी सुरू असलेल्या या कामात त्यांनीही लक्ष घालत दर्जेदार काम करण्यावर भर दिला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात गोरगरीब नागरिकांना पुराच्या पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी नगर परिषद स्तरावर सुरू असलेली ही कामे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहेत. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पूरनियंत्रण या सर्व बाबींचा विचार करून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे चिखली शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुशोभित होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.