विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीकराची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे.
रत्नागिरी (Ratnagiri Fraud Case) : विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीकराची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन सख्ख्या भावांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील सज्जाद अहमद खान यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर अशी आरोपींची नावे असून, ते रत्नागिरीतील मिरजोळे परिसरात वास्तव्यास आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत घडली. आरोपींनी खान यांना परदेशात कामगार पाठवून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खान यांनी ५६ जणांना परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये या प्रमाणे एकूण सुमारे ५० लाख रुपये रोख स्वरूपात आरोपींना दिले.
मात्र, आरोपींनी संबंधित कामगारांना नियोजित देशात किंवा नोकरीवर न पाठवता इतरत्र पाठवले. त्यामुळे या सर्व कामगारांची मोठी गैरसोय झाली. अखेर सज्जाद खान यांना स्वतःच्या खर्चाने या ५६ जणांना पुन्हा भारतात परत आणावे लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी रत्नागिरी गाठून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.