चित्रपटात आणि रंगभूमीवर अभिनय आणि आपल्या संवाद फेकीने जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची २८ मार्च रोजी जयंती आहे.
दिनविशेष
नागपूर (Raja Gosavi) : चित्रपटात आणि रंगभूमीवर अभिनय आणि आपल्या संवाद फेकीने जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची २८ मार्च रोजी जयंती आहे.
२८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे राजा गोसावी यांचा जन्म झाला. आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामूअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामूअण्णांच्या प्रभाकर नाट्यमंदिरात ते प्रॉम्प्टर म्हणून नोकरी करत. याच कंपनीच्या 'भावबंधन' या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. 'अखेर जमलं' या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी 'लाखाची गोष्ट' या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाखमोलाचा ठरला. 'लाखाची गोष्ट' हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिव पेठेत. त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः गाजवली.
जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशा विविध नायिकांची साथ राजा गोसावी यांना लाभली. राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भावव संवादफेकीचं अचूक टायमिंग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांची लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी 'राजा गोसावींची गोष्ट' या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील 'रंगतरंग' या कार्यक्रमात बोलताना राजा गोसावी म्हणाले होते, 'माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! 'लाखाची गोष्ट' या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी 'टाळ्या व हशे' जमा आहेत. म्हणूनच आडनाव 'गोसावी' असले तरी रसिक मला विनोदाचा 'राजा' म्हणतात!' राजा गोसावी यांना मराठीतील 'दिलीपकुमार' म्हणत असत. राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.