तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या आटोपल्या.
कोरपना : तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या आटोपल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके आता करपण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन आणि पावसाचा खंड यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यात कपाशी, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अंकुरलेली पिके जगवण्यासाठी सध्या पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र, जुलै महिना उजाडला तरीही दमदार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत जमीन कोरडी पडल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.
अशाच प्रकारे आणखी काही दिवस पाऊस न आल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर दुबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने, आधीच कर्जाच्या खाईत असलेला कोरपना तालुक्यातील शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने त्वरित हजेरी न लावल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी चिंता स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.