साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
17 जूनपासून रोज धावणार नवी एक्स्प्रेस; पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा
(Pune Shirdi Express) साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुणे ते साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवा अखेर सुरू होत असून, 17 जूनपासून पुणे-शिर्डी दैनंदिन एक्स्प्रेस नियमित धावणार आहे. या नव्या रेल्वे सेवेमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि आरामदायी होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 17 जून 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे आणि शिर्डी यांना थेट रेल्वेमार्गाने जोडणारी ही पहिलीच सेवा ठरणार असून, दीर्घकाळापासून होत असलेली भाविकांची मागणी यामुळे पूर्ण होत आहे.
देशभरातून शिर्डीला भेट देणाऱ्या भाविकांसाठी पुणे हे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. रेल्वे स्थानक आणि विमानतळावर विविध राज्यांतून येणारे अनेक प्रवासी उतरतात. मात्र, शिर्डीपर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे अतिरिक्त वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. नव्या रेल्वे सेवेमुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, आयटी आणि औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण ऑटो क्लस्टर यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक येथे येत असतात. तसेच शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि जवळील लोणावळा, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांमुळे पुण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे श्री साईबाबांचे पवित्र स्थान मानले जाते. वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक भाविकांसाठी महत्त्वाची वाहतूक सुविधा पुरवत असून, पुण्याहून सुरू होणारी ही थेट सेवा धार्मिक पर्यटनाला अधिक चालना देईल, अशी अपेक्षा आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबांसह प्रवास करणारे भाविक आणि समूह पर्यटनासाठी ही रेल्वे सेवा सुरक्षित व सोयीची ठरणार आहे. त्यामुळे वृद्ध प्रवाशांचा प्रवासातील त्रास कमी होईल. याशिवाय, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय सेवांपर्यंत जलद पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या नव्या रेल्वे सेवेचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. शिर्डी परिसरातील हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा आणि स्थानिक विक्रेत्यांकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने आर्थिक उलाढालीला चालना मिळू शकते.
मार्गातील महत्त्वाचे थांबे
दौंड कॉर्ड केबिन
पुणे-दौंड आणि दौंड-मनमाड मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा बिंदू असून, प्रवाशांना अखंड आणि वेगवान संपर्क सुविधा उपलब्ध करून देतो.
श्रीगोंदा
स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी जलद व परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा थांबा.
अहिल्यानगर
प्रशासकीय, लष्करी आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या या शहरातून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करतात.
राहुरी
येथे असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ मुळे हा भाग शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांसह संशोधक आणि शास्त्रज्ञांना या थांब्याचा मोठा फायदा होणार आहे.
बेलापूर
साखर उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातून प्रसिद्ध 'शनि शिंगणापूर' येथे जाणाऱ्या भाविकांनाही या रेल्वे सेवेचा लाभ मिळणार आहे.
पुणे-शिर्डी दैनंदिन एक्स्प्रेसच्या प्रारंभामुळे या संपूर्ण पट्ट्यातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून, धार्मिक पर्यटन, व्यापार आणि प्रवासी सुविधा यांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.