विधानसभा क्षेत्रात सध्या विकासाचा दावा करत विविध उपक्रम राबवले जात आहेत.
आदासा पाणंद रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संतापाची लाट
धापेवाडा (Poor Construction) : विधानसभा क्षेत्रात सध्या विकासाचा दावा करत विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, याच क्षेत्रातील आदासा पाणंद रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचे भीषण वास्तव 'देशोन्नती'ने उघड केल्याने खळबळ उडाली. रस्त्यावर वरून मुरुमाचा लेप आणि खाली मातीचा खेळ तसेच फुटलेले पाईप टाकण्यात आले. ही वस्तुस्थिती चव्हाट्यावर आल्यानंतर यंत्रणेने कामात सुधारणा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आदासा पाणंद रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संतापाची लाट आहे. बळीराजाच्या पैशावर डल्ला मारणारी 'भ्रष्ट ठेकेदारी' थांबवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भ्रष्ट ठेकेदारी थांबवा
कंत्राटदाराने मुरुमाऐवाजी काळी माती टाकली. निकृष्ट साहित्य वापरून काम उरकले. सदर वृत्त दै. 'देशोन्नती' वृत्तपत्रात प्रकाशीत झाल्यावर सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. निकृष्ट काम उघड झाल्यावर काही प्रमाणात मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित केला जात असल्याची माहिती आहे. कंत्राटदाराने आधीच अंदाजपत्रकानुसार काम केले असते, तर आज ही नामुष्की ओढवली नसती,' अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे. विशेष म्हणजे कामावर देखरेख ठेवणारे काही तरुण एका शिक्षण संस्थेशी संबंधित असून, त्याचा शासकीय यंत्रणेशी काय हितसंबंध आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या कामात मोठे गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. संपूर्ण क्षेत्रातील कामांची निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, कंत्राटदाराचे खिसे भरण्याचा नाही
दै. देशोन्नतीत प्रकाशीत वृत्ताची दखल घेत यंत्रणेकडून कामात सुधारणा केली जात आहे. मात्र, रस्त्याची केवळ वरवरची मलमपट्टी नको आहे. आदासा रोड ते ब्रह्मपुरी रोड शिव पाणंद रस्त्यावर नियमानुसार मुरुमाचा ५ ते ६ इंच जाड थर आणि रुंदी हवी आहे. तसेच फुटलेले पाईप बदलून नवीन दर्जेदार पाईप टाकावे. शासकीय अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत या कामाची देयके प्रशासनाने काढू नये.
-विलास ठाकरे, त्रस्त शेतकरी