Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

Political Meeting

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया; 'वेगळे राजकीय समीकरण दिसत नाही'

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहे.


जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया वेगळे राजकीय समीकरण दिसत नाही

Political Meeting |

राष्ट्रवादीच्या अर्थखात्यावरील दाव्याचा पुनरुच्चार; शरद पवारांच्या पक्षाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे मत

मुंबई : राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देत या भेटीत कोणतेही वेगळे राजकीय समीकरण असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे स्पष्ट केले.

शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत. ते सात वेळा विधिमंडळावर निवडून आले असून त्यांनी राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना विविध कारणांसाठी भेटू शकतात. त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचे कोणतेही कारण नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेचाही उल्लेख केला. शरद पवार यांनी अनेक दशकांपासून राज्य आणि केंद्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याने भविष्यात कोणासोबत राजकीय वाटचाल करायची, याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या पक्षाला असल्याचे सुनील तटकरे यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळू नये यासाठी प्रयत्न करत असून त्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा असल्याबाबतही तटकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अशा चर्चांवर विश्वास नसल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले असून ते इतर पक्षांना कोणते खाते मिळावे किंवा मिळू नये, अशा प्रकारची भूमिका घेतात, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, गेल्या तीन वर्षांच्या राजकीय अनुभवातून एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षांच्या खात्यांबाबत आक्षेपार्ह भूमिका घेतल्याचे कधीही जाणवले नसल्याचे तटकरे म्हणाले. शिंदे स्वतःच्या राजकीय शैलीनुसार निर्णय घेतात आणि त्यांनी उचललेल्या अनेक पावलांना यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावरील दावा पुन्हा स्पष्ट केला. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, ही पक्षाची भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीसंदर्भात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, त्या भेटीत इतर काही विषयांवरही चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शरद पवार यांच्या पक्षातील काही सहकाऱ्यांच्या सत्तेतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत विचारले असता, याविषयी आपल्याकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, सहा दशकांहून अधिक काळ शरद पवार यांनी राज्य आणि केंद्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या पक्षाला भविष्यातील राजकीय निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना माहिती न देता सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही समोर आले. या भेटीत भविष्यात महायुतीतील किंवा घटकपक्षातील नेत्यांच्या बैठकींबाबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना माहिती दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची चर्चा आहे.

या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे ही सामान्य बाब आहे. प्रशासकीय अथवा संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी अशा भेटी होत असतात आणि त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: