उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया; प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचे राजकारण केल्याचा आरोप
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून काँग्रेसवर सातत्याने टीका होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख केला, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसला जनतेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची भूमिका दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसवर अधिक टीका करत, "बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ" या भूमिकेतून पक्षाचे राजकारण सुरू असल्याचे म्हटले. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत इतक्या खालच्या स्तरावरील भाषा आणि टीका यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला असून, या मुद्द्यावर राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.