विधानपरिषदेच्या उमेदवारीनंतर बच्चू कडू यांच्या कारंजा दौऱ्यात घडलेल्या एका राजकीय घडामोडीने विदर्भाच्या राजकारणात नवा प्रश्न निर्माण केला आहे.
कारंजा घाडगे (Political Controversy) : विधानपरिषदेच्या उमेदवारीनंतर बच्चू कडू यांच्या कारंजा दौऱ्यात घडलेल्या एका राजकीय घडामोडीने विदर्भाच्या राजकारणात नवा प्रश्न निर्माण केला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना आपल्या गोटात घेत विदर्भातील राजकीय अस्तित्व अधिक मजबूत करण्याचा डाव आखल्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिंदे गट यांच्यातील मतभेद कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. कारंजा शहरात बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि हार-तुऱ्यांसह जंगी स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बच्चू कडू यांनी स्वागतस्थळी न थांबताच पुढे मार्गक्रमण केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश करताना प्रहारच्या अनेक जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी कोणताही संपर्क साधला नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कारंजा नगरपंचायतीवर सध्या शिंदे गटाची सत्ता आहे. या नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहे. स्थानिक स्तरावर प्रहारने अनेकदा आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या स्वागताला उपस्थित राहणे टाळल्याने या चर्चेला अधिक खतपाणी मिळाले आहे.
वरिष्ठ पातळीवर राजकीय समीकरणे जुळत असली तरी स्थानिक स्तरावर प्रहार आणि शिंदे गट एकत्र येणार का, हा प्रश्न आता नव्याने उपस्थित झाला आहे. कारंज्यातील या घटनेमुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.