Police force accommodation: पोलीस कर्मचार्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणारा आणि शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा गृहनिर्माण प्रकल्प हिंगोलीत पूर्णत्वास येत आहे.
हिंगोली (Police force accommodation) : पोलीस कर्मचार्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणारा आणि शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा गृहनिर्माण प्रकल्प हिंगोलीत पूर्णत्वास येत आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदानालगतच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीच्या जागी आता आधुनिक, बहुमजली इमारतींचा टॉवर दिमाखात उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा पोलीस दलातील शेकडो कर्मचार्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असून, त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित आणि सन्मानजनक निवारा मिळणार आहे.
ब्रिटिशकालीन धाटणीची जुनी घरे गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झाली होती. पावसाळ्यात गळणारी छते, भिंतींना येणारी ओल, आणि वारंवार तुंबणार्या ड्रेनेज लाईनमुळे पोलीस कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कर्तव्यावर असताना कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी पोलिसांच्या मनात कायम असायची. हीच व्यथा लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने जुनी वसाहत पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला होता. आज तीच जागा शहराचे नवे आकर्षण ठरत आहे.
या (Police force accommodation) नव्या वसाहतीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर संपूर्ण परिसरच सुसज्ज करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबासाठी हवेशीर व सूर्यप्रकाश येईल असे प्रशस्त फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. बांधकामासाठी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, २४ तास पाणीपुरवठा, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान आणि संपूर्ण परिसरात एलईडी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. सध्या इमारतींच्या रंगरंगोटी आणि वीजजोडणीचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू असून, येत्या काही महिन्यांतच या वास्तूचे लोकार्पण होऊन पोलीस कर्मचार्यांना ताबा दिला जाणार आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार्या या हक्काच्या घरामुळे पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे. 'पोलीस कर्मचारी अहोरात्र तणावपूर्ण परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी झटत असतो. ड्युटी संपवून घरी परतल्यावर त्याला जर प्रसन्न, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळाले तर त्याचा कामावरील ताण निश्चितच कमी होतो. कवायत मैदानाशेजारील ही नवी वसाहत आमच्या कर्मचार्यांना मानसिक स्थैर्य देईल आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करेल,' अशी भावना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली. या भव्य प्रकल्पामुळे संत नामदेव कवायत मैदान परिसराचा संपूर्ण कायापालट झाला असून, हिंगोली शहराच्या आधुनिकीकरणात मोलाची भर पडली आहे. बाहेरगावाहून येणार्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारा हा टॉवर आता हिंगोलीच्या वैभवात भर घालणारा नवा मानबिंदू ठरला आहे.
तीन महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता
पोलिस कर्मचार्यांना मिळणार पक्के छत:
जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्यांना चांगल्या दर्जाचे निवासस्थान मिळणार आहे. पोलिस हाऊसिंग अॅन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ही निवासस्थाने तयार केली जात आहेत. सी.जी. असोशिएट जालना यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या कामावर प्रोजेक्ट मॅनेजर देवेंद्र धर्माधिकारी यांनी या (Police force accommodation) इमारतीच्या बांधकामाचे कामकाज हाताळले आहे. या इमारतीमध्ये टू बीएचकेचे ९६ आणि ३ बीएचकेचे ४ निवासस्थान तयार होत आहेत. जवळपास तीन महिन्यात या निवासस्थानांचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.