आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर लागल्या पेट्रोल नसल्याच्या पाट्या
गडचिरोली : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामागे आखाती युद्धाचे कारण नसुन पेट्रोलपंपचालक व कंपन्यांचा आपसी वाद असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
आखाती युद्ध सुरू झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोलचा पुरवठा ठप्प पडत आहे. शनिवारपासून मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पेट्रोलची टंचाई प्रकर्षाने जाणवु लागली. गडचिरोली शहरातील एक-दोन पेट्रोपंप वगळता उर्वरीत सर्व पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध नव्हते. यामुळे दुचाकीस्वार तसेच कारचालकांनी पेट्रोलपंपावर धाव घेतली. चंद्रपूर मार्गावरील पेट्रोलपंपावर होणारी गर्दी लक्षात घेता पेट्रोलपंप चालकांनी २०० रूपयापेक्षा जास्त पेट्रोल देणे बंद केले होते. शहरातील बट्टुवार पेट्रोलपंपावर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र या पेट्रोलपंपावरीलही पेट्रोल संपल्याने अनेक वाहनचालकांनी आपली वाहने पेट्रोलपंपावरच ठेऊन दिल्याचे निदर्शनास येत होते.
पेट्रोल अभावी अनेकांची कामे खोळंबली होती. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पेट्रोलच्या तुटवड्याचा युद्धाशी काहीही सबंध नसल्याचे स्पष्ट केले. यापुर्वी पेट्रोल पुरवठा करणार्या कंपन्या पेट्रोलपंप चालकांना उधारीवर पेट्रोल देत होत्या. मात्र आता त्यांनी उधारीवर पेट्रोल देणे बंद केले असुन जेवढे पैसे भराल तेवढाच पेट्रोलचा पुरवठा होईल असे धोरण स्वीकारले आहे. यामुळे पेट्रोलपंप चालकांचा पुरवठा खंडीत झाला होता. येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होईल असेही जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी सांगितले.