चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेता बदलाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
व्हिप, बैठकांचे आदेश आणि अपात्रतेचे इशारे; २७ नगरसेवक कोंडीत, राजकीय वातावरण तापले
चंद्रपूर (Party Factionalism) : चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेता बदलाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने विद्यमान गटनेता बदलण्यासाठी आज १५ जून रोजी बैठक आयोजित केली असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी १४ जून रोजीच तातडीची बैठक बोलावून पक्षाचा व्हिप जारी केला आहे.
१४ जून रोजी झालेल्या बैठकीला २७ पैकी केवळ ११ नगरसेवक उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे दोन्ही गटांकडून कायदेशीर कारवाई आणि अपात्रतेच्या इशाऱ्यांची मालिका सुरू झाल्याने काँग्रेस नगरसेवकांची स्थिती अत्यंत अडचणीची झाली आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा दुहेरी संकटात ते सापडले असल्याची राजकीय चर्चा आहे.
धानोरकर समर्थक गटातील सुमारे १५ नगरसेवक यवतमाळ येथील एका रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वातावरण अधिकच तापले. त्यानंतर या गटाकडून काँग्रेस नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा लावण्यात आल्या. या हालचालींना प्रत्युत्तर देताना राजेश अडूर यांनी सर्व २७ नगरसेवकांना पत्र पाठवून १४ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
दोन्ही गटांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रांमुळे नगरसेवकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेश अडूर यांनी १५ जून रोजी बोलावलेली बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा करत, त्या बैठकीला उपस्थित राहू नये तसेच कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तर १४ जूनच्या अधिकृत बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे नगरसेवक द्विधा मनःस्थितीत असून कोणत्या गटाच्या बैठकीला हजेरी लावावी याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. याआधीही मनपातील गटनेता निवडीवरून असाच संघर्ष उफाळला होता. तो वाद नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचला होता. त्या वेळी वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांना गटनेतेपद आणि धानोरकर गटाला महापौरपदाच्या उमेदवारीवर समाधान मानावे लागले होते. मात्र अवघ्या चार महिन्यांतच पक्षातील हा संघर्ष पुन्हा तीव्र स्वरूपात समोर आला आहे.