Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Parswani Family

GPay व्यवहारामुळे उलगडले नागपूरातील बेपत्ता पारस्वानी कुटुंबाचे रहस्य; 11 दिवसांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सुखरूप सापडले

नागपूरमधील धंतोली परिसरातून गूढरित्या बेपत्ता झालेल्या पारस्वानी कुटुंबाचा तब्बल 11 दिवसांनंतर शोध लागला असून, एका ऑनलाइन GPay व्यवहारामुळे या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली.


gpay व्यवहारामुळे उलगडले नागपूरातील बेपत्ता पारस्वानी कुटुंबाचे रहस्य 11 दिवसांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सुखरूप सापडले

मोबाईल सतत बंद ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; एका ऑनलाइन व्यवहाराच्या डिजिटल पुराव्यामुळे कुटुंबाचा ठावठिकाणा लागला

नागपूरमधील धंतोली परिसरातून गूढरित्या बेपत्ता झालेल्या पारस्वानी कुटुंबाचा तब्बल 11 दिवसांनंतर शोध लागला असून, एका ऑनलाइन GPay व्यवहारामुळे या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. सर्व मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, डिजिटल व्यवहारातून निर्माण झालेल्या लोकेशनच्या आधारे तपास यंत्रणांनी कुटुंबाचा माग काढत त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये सुखरूप शोधून काढले.

धंतोली येथील बलराज मार्गावरील दुर्गा सदन येथे राहणारे जितेंद्र पारस्वानी हे 24 जून रोजी आपल्या आई हर्षा पारस्वानी, पत्नी ईशिता, मुलगी खुशी आणि मुलगा कृष्णा यांच्यासह अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन बंद असल्यामुळे कॉल डिटेल्स, लोकेशन किंवा इतर कोणताही तांत्रिक पुरावा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल झाल्यानंतरही तपास अनेक दिवस ठप्प अवस्थेत होता.

तपासादरम्यान पोलिसांनी विविध शक्यतांचा शोध घेतला. नातेवाईक, परिचित तसेच कुटुंबाच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करण्यात आली. मात्र, पारस्वानी कुटुंबाने बराच काळ अनेकांशी मर्यादित संपर्क ठेवल्यामुळे तपासाला अपेक्षित दिशा मिळत नव्हती.

दरम्यान, तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंबाने आपला माग काढता येऊ नये म्हणून मोबाईल डेटा सतत बंद ठेवला होता. मात्र, डिजिटल पेमेंट करण्यासाठी त्यांनी काही क्षणांसाठी इंटरनेट सुरू केले. याच काळात करण्यात आलेल्या GPay व्यवहाराची डिजिटल नोंद तपास पथकाच्या हाती लागली.

या ऑनलाइन व्यवहारातून मिळालेल्या लोकेशनच्या आधारे कुटुंब पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची खात्री पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी होताच नागपूर पोलिसांचे विशेष पथक तातडीने पुण्याकडे रवाना झाले. संबंधित कुटुंब सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी नागपूरला आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात पारस्वानी कुटुंब गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी नागपूर सोडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासात असेही उघड झाले की, जितेंद्र पारस्वानी यांनी थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्तेतील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मालकी हक्कावरील वाद आणि कायदेशीर अडचणींमुळे हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण अधिक वाढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आर्थिक संकट हेच कुटुंबाच्या अचानक बेपत्ता होण्यामागील प्रमुख कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, नेमका घटनाक्रम आणि इतर कोणतेही कारण होते का, याचा सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांनी सर्व पाचही सदस्य सुरक्षित आणि सुखरूप असल्याची पुष्टी केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे पोहोचलेले विशेष पथक त्यांना नागपूरला आणल्यानंतर सविस्तर जबाब नोंदविणार असून, संपूर्ण घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट केली जाणार आहे.

या प्रकरणाचा तपास धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस शिपाई नितीन कोल्हे आणि तपास पथकातील इतर अधिकाऱ्यांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे कुटुंबाचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

11 दिवसांपासून शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या बेपत्ता कुटुंबाच्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने नागपूर पोलिसांसह पारस्वानी कुटुंबाचे नातेवाईक आणि हितचिंतकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Related to this topic: