Kisan Sabha Andolan: पाथरी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी निदर्शने
कर्जमाफीवरील अटी रद्द करण्याची मागणी प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन....!
परभणी (Kisan Sabha Andolan) : पाथरी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार १० जुलै दुपारी पाथरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या नावाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात दोन लाख रुपयांची कर्जमर्यादा रद्द करणे, २०१९ मधील कर्जमाफी लाभार्थ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देणे, नियमित कर्जदारांवरील कठोर अटी हटविणे, सहकार क्षेत्रातील कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील गरीब लोकप्रतिनिधींना कर्जमाफीत समाविष्ट करणे, शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी घेतलेल्या कर्जांचाही योजनेत समावेश करणे, तसेच मायक्रो फायनान्स, सोनेतारण व इतर शेतीसंबंधित कर्जांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
कर्जमाफीवरील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो शेतकरी वंचित राहत असून सरकारने दिलेल्या सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. (Kisan Sabha Andolan) यावेळी कॉ. दीपक लिपने, कॉ. भारत गायकवाड, कॉ. बळीराम वर्हाडे, कॉ. भास्कर यादव, कॉ. भारत फुके, कॉ. अंबादास साळवे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.