Parbhani Yashwadi Temple Accident: मानवत तालुक्यातील यशवाडी मंदिरात शनिवार दुपारी अतिक्रियात्मक दगडांना प्रहारामुळे चार भक्तांचा मृत्यू आणि २३ गम्भीर जखमी झाली. घटना आहाताना तळमळीच्या गर्भात
शनिवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर जड दगडांचा मलबा कोसळला;
बचावकार्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर धावपळ...!
परभणी (Parbhani Yashwadi Temple Accident) : जिल्ह्यातील मानवत तालुक्यात शनिवारी दुपारी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. परभणी–मानवत मार्गावरील कोल्हा शिवारातील प्रसिद्ध यशवाडी मंदिराच्या गाभाऱ्याचा भाग अचानक कोसळल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २३ भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. यासाठी मोठ्या दगडांचा वापर करण्यात येत होता. शनिवार हा दर्शनासाठी विशेष दिवस असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याचवेळी गाभाऱ्याच्या बांधकामाचा काही भाग अचानक कोसळून जड दगड भाविकांच्या अंगावर पडले.
घटनेनंतर मंदिर परिसरात एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. अनेक भाविक दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकले. प्राथमिक माहितीनुसार चार भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने आर. पी. मेडिकल कॉलेज तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पाथरीचे आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, परभणीचे महापौर सय्यद इकबाल, सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर, तसेच मुंबईहून पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक घटनास्थळी रवाना झाले. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मनपा सदस्य केदार खातींग यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी दोन जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाभारा कोसळण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच मृत आणि जखमींची अधिकृत संख्या स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.