Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Pankanerga Water Crisis

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब; पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगा परिसरात गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.


पंधरा दिवसांपासून पाऊस गायब पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

Pankanerga Water Crisis |

जलस्वराज्य योजनेअंतर्गत विहिरीची पाणीपातळी खालावली; पर्यायी पाणीपुरवठ्याची ग्रामस्थांची मागणी

पानकन्हेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगा परिसरात गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विहिरीतील पाणीसाठा अत्यल्प झाल्यामुळे ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले असून गावात चिंतेचे वातावरण आहे.

पानकनेरगा गावातील बहुतांश पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जलजीवन मिशन योजनेवरील या विहिरीतून केला जातो. संबंधित विहीर बेलदरी पाझर तलावालगत सन २००३ मध्ये खोदण्यात आली होती. पाझर तलावामुळे वर्षभर विहिरीला पाण्याचा आधार मिळत असल्याने ही योजना गावासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मात्र, यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे भूजल पातळी आधीच खोलवर गेली होती. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु मृग नक्षत्र लागून महिना उलटूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी बेलदरी पाझर तलावात अपेक्षित पाणीसाठा झालेला नसून जलस्वराज्य योजनेच्या विहिरीची पाणीपातळी दिवसेंदिवस घटत आहे. विहिरीत अत्यल्प पाणी शिल्लक राहिल्याने नियमित पाणीपुरवठा करणे कठीण झाले असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास गावातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जलस्वराज्य योजना गावासाठी जीवनदायिनी ठरली असली तरी पावसावर अवलंबून न राहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया : अर्चना देशमुख (प्रशासक)

"गेल्या चार महिन्यांपासून गावातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आजूबाजूच्या विहिरीतील पाणी आणून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जलस्त्रोत, नदी-नाले कोरडे असून विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेली आहे. ग्रामस्थांना पाणी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत."

प्रतिक्रिया : विठ्ठल झूंगरे (माजी चेअरमन)

"जलस्वराज्य योजनेअंतर्गत सन २००३ मध्ये खोदण्यात आलेली विहीर पानकनेरगावासाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. सुमारे १४ हजार लोकसंख्या असलेल्या गावाची तहान ही विहीर भागवत आहे. मात्र यावर्षी पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून गावावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी."

प्रतिक्रिया : गजानन क्षीरसागर (माजी जि. सदस्य)

"पानकनेरगावातील संपूर्ण पाणीपुरवठा बेलदरी पाझर तलावालगत असलेल्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर अवलंबून आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने पाझर तलावात अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी विहिरीची पाणीपातळी झपाट्याने घसरली असून गावाचा पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता आहे."

प्रतिक्रिया : महाविर ठाकूर

"आधीच कडक उन्हाळ्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली होती. त्यात भर पावसाळ्यातही पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने पानकनेरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून विहिरीत अत्यल्प पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी."

Related to this topic: