शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून “ऑपरेशन टायगर” संदर्भात सर्वात ताजी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष; शिंदे गटात सामील होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती
मुंबई (Operation Tiger) : शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून “ऑपरेशन टायगर” संदर्भात सर्वात ताजी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून स्वतंत्र गट तयार करून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा संसदेकडून शनिवारी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही घोषणा शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर म्हणजेच 20 जूननंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एबीपी न्यूजच्या राजकीय संपादक मेघा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वाक्षरी केलेले पत्र सादर केले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र सुमारे 48 तासांपूर्वी सादर करण्यात आले असले तरी त्यावर तत्काळ कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 20 जून रोजी या सहा खासदारांचे शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी संसदेकडून बुलेटिन जारी केले जाऊ शकते, ज्यामध्ये या प्रक्रियेची अधिकृत नोंद होईल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान लोकसभा अध्यक्षांकडून ठाकरेंच्या गटाच्या प्रतिनिधींनाही चर्चेसाठी बोलावले जाऊ शकते, मात्र अंतिम निर्णय अध्यक्षांचाच राहणार असल्याचे मेघा प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला व्हीप धुडकावून हे सहा खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या खासदारांच्या भूमिकेबाबत चर्चांना अधिक उधाण आले आहे. या बैठकीत केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चार खासदार उपस्थित होते. गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या गटातून हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता अधिक दृढ होत आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत “आमच्या पक्षातून निवडून आलात तर राजीनामा द्या” असे आव्हान दिले आहे. तसेच “आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
फुटल्याचा दावा करण्यात आलेल्या सहा खासदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई).