ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सरकारला थेट आव्हान दिले.
जातीनिहाय जनगणना, आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून सरकारला खुले आव्हान
सेनगाव (OBC Reservation) : ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या जनजागृती अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे शुक्रवारी (दि. १२ जून) सायंकाळी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सरकारला थेट आव्हान दिले.
सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. हाके म्हणाले, "ओबीसी समाज हा शांत, संयमी आणि कष्टकरी आहे. या समाजाला आपल्या मतांच्या ताकदीची जाणीव झाली आहे. त्यामुळे सत्तेत बसलेल्या काहींची मनमानी कायमची थांबेल. आम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर कधीही तडजोड केलेली नाही आणि आपली ओळखही कधी लपवलेली नाही."
आरक्षणाच्या लढ्यात अनेक धनगर, बंजारा आणि ओबीसी समाजातील बांधवांनी प्राणांची आहुती दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. "आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या समाजाच्या जीवाची किंमत शासनाला उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्दैवी घटनांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी बाब आहे," असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना प्रा. हाके यांनी राज्य सरकारला खुले आव्हान दिले. "ओबीसी समाजाचे गावगाड्यावरील सुमारे ७० टक्के राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला आमच्याशी चर्चेसाठी पाठवावे. आरक्षण कसे संपले नाही, हे त्यांनी आम्हाला पटवून द्यावे. अन्यथा आम्ही पुराव्यानिशी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू," असे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या तसेच सामाजिक आणि आर्थिक स्थिती समोर आणण्यासाठी जातीनिहाय जनगणना अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रा. हाके यांनी राज्यभर जनजागृती मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. समाजाने संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी सजग आणि जागरूक राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना प्रा. हाके यांनी काही प्रमुख राजकीय नेत्यांवर तसेच पवार कुटुंबीयांवरही टीका केली. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जयपूर येथे झालेल्या या सभेसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, बळीराम खटके, अॅड. रवी शिंदे तसेच आयोजक व जयपूरचे सरपंच संदीप पायघन उपस्थित होते. याशिवाय सेनगाव तालुक्यासह परिसरातील विविध गावांतील ओबीसी बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सभेदरम्यान आरक्षण, जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांबाबत घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात ओबीसी जनजागृती मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे.