Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.


ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

OBC Reservation |

कळमनुरी  (OBC Reservation) : कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. यामुळे ग्रामसभा गोंधळात पार पडली असून ग्रामस्थांनी इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला.

आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ जून रोजी पोतरा ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य आरक्षणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी व्ही. एन. किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला ग्राम महसूल अधिकारी दिनेश राऊत आणि ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. अंभोरे उपस्थित होते.

सभेदरम्यान अध्यासी अधिकाऱ्यांनी २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार नऊ सदस्यांपैकी अनुसूचित जातीसाठी तीन आणि अनुसूचित जमातीसाठी दोन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामुळे आरक्षणाचा ५० टक्के कोटा पूर्ण झाल्याने ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या निर्णयाला उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडत ग्रामस्थांनी सभेतच विरोध दर्शविला. आरक्षण प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत अनेक ग्रामस्थांनी सभा पुढे चालू देण्यास विरोध केला.

यावेळी काही ग्रामस्थांनी, "जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होऊ देणार नाही," अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. परिणामी वातावरण तणावपूर्ण बनले आणि ग्रामसभा प्रभावीपणे पार पडू शकली नाही.

दरम्यान, ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेच्या इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रसंगी पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, शंकर मुलगीर, गणेश मुलगीर, सरपंच रघुनाथ गुहाडे, माजी सरपंच गुणाजी फोपसे, रामराव मुलगीर, शंकर रणवीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: