पक्षाच्या कामकाजात कोणताही अनावश्यक हस्तक्षेप होत असल्यास त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांचा पक्षनेत्यांना स्पष्ट संदेश; ‘अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही’
मुंबई (NCP 27th Foundation Day) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी संघटनेतील पदाधिकारी आणि नेत्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत पक्षशिस्त आणि पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे ठामपणे सांगितले. पक्षाच्या कामकाजात कोणताही अनावश्यक हस्तक्षेप होत असल्यास त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना पक्षासमोरील आव्हाने आणि परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आतापर्यंत पक्षात घडलेल्या अनेक गोष्टींकडे समजुतीने पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवंगत अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जपल्या, त्यांना सन्मान दिला आणि शक्य तेवढ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढील काळात प्रत्येक निर्णय हा पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करूनच घेतला जाईल.
पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने संघटनेच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती, त्याच धर्तीवर आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील. असे निर्णय घेणे वैयक्तिक स्वभावाला कठीण जाऊ शकते, मात्र पक्ष बळकट करण्यासाठी ते आवश्यक असल्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पक्षाची प्रतिमा आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. पक्षाची बदनामी होईल अशा परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागू शकते, असे संकेत त्यांनी दिले.
कार्यकर्त्यांच्या योगदानाबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचे काम, समर्पण आणि पक्षासाठीचे योगदान आपल्या लक्षात असल्याचे सांगितले. योग्य वेळी योग्य कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी विविध महामंडळांवरील नियुक्त्यांबाबतही महत्त्वाची घोषणा केली. लवकरच या नियुक्त्या जाहीर केल्या जातील आणि त्यासाठी पक्षनिष्ठा व समर्पण हेच प्रमुख निकष असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीने किती वर्षे पक्षात काम केले यापेक्षा पक्षाच्या वाढीसाठी त्याने किती योगदान दिले, याला अधिक महत्त्व दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
तसेच पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांचा सन्मान राखण्यासाठी काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागू शकतात, मात्र त्याचा फटका जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना बसू दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली.