कतारचे माजी अमीर यांच्या निधनानिमित्त केंद्र शासनाने दि. १३ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.
माहूर (नांदेड) : कतारचे माजी अमीर यांच्या निधनानिमित्त केंद्र शासनाने दि. १३ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असताना, माहूर शहरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्पाच्या उद्घाटनाचा शासकीय कार्यक्रम मोठ्या थाटात हार-तुरे आणि भाषणांसह साजरा करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधितांना राष्ट्रीय दुखवट्याचे गांभीर्य नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
गृह मंत्रालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार, राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविणे आणि कोणतेही शासकीय मनोरंजन अथवा औपचारिक कार्यक्रम आयोजित न करणे अपेक्षित असते. असे असतानाही माहूर शहरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह परिसरात सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवड प्रकल्पाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात केला.

किनवट सामाजिक वनीकरण विभागामार्फत अडीच एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, ग्राम महसूल अधिकारी, वनरक्षक, स्थानिक मान्यवर, पत्रकार तसेच अन्य अशासकीय नागरिक उपस्थित होते.
मात्र, राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी अशा स्वरूपाचा शासकीय उद्घाटन सोहळा घेता येतो का? संबंधित अधिकाऱ्यांना गृह मंत्रालयाच्या आदेशांची माहिती नव्हती का? की केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राष्ट्रीय दुखवट्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांसाठी बंधनकारक असताना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने एका पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व विभागप्रमुखांना दिली असतानाही माहूरातील या कार्यक्रमामुळे सामाजिक वनीकरण प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.