Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

स्वीकृत सदस्य निवडीत वाद; काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद उफाळले

नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत तणाव वाढला आहे.


स्वीकृत सदस्य निवडीत वाद काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद उफाळले

Nagpur Politics |

नागपूर (Nagpur Politics) : नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत तणाव वाढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांच्या समर्थकाला संधी न मिळाल्याने पक्षात असंतोष निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राऊत राजीनामा देतील का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसंदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. या प्रक्रियेत एक सदस्य राऊत गटातून आणि दुसरा शहराध्यक्ष विकास ठाकरे गटातून निवडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात दोन्ही उमेदवार शहराध्यक्षांच्या गटातूनच निवडण्यात आल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले की, नागपूर मनपा आयुक्तांनी मागील आठवड्यात कोटा निश्चित केला होता आणि त्यानुसार अर्ज सादर करणे अपेक्षित होते. मात्र काल सकाळपर्यंत याबाबत कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. मी प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले होते की, एक उमेदवार आमच्या गटाचा आणि एक त्यांच्या गटाचा असावा.

राऊत पुढे म्हणाले की, आमचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी गेला असता त्याला संधी दिली गेली नाही. शेवटच्या क्षणी, अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधीच काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. ही बाब आमच्यासाठी नवीन नसून यापूर्वीही आमच्या गटाला अशाच प्रकारे डावलण्यात आले आहे.

पक्षांतर्गत अन्यायाचा आरोप करताना त्यांनी नमूद केले की, दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. एबी फॉर्म गायब होण्यासारख्या घटना घडत आहेत. हा केवळ माझाच नव्हे, तर प्रदेशाध्यक्षांचाही अपमान आहे. स्थानिक पातळीवर आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजीनाम्याबाबत विचारले असता राऊत यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले, मात्र त्यांनी इशारा दिला. आम्हाला वाया गेलेल्या कागदाप्रमाणे वापरू देणार नाही. आम्ही लढाऊ वृत्तीचे लोक आहोत आणि पुढेही संघर्ष करत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर नागपूरला आजवर योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. २० जणांनी अर्ज भरले असले तरी उत्तर नागपूर आणि दलित समाजाला संधी देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

दरम्यान, ‘नारी शक्ती अधिनियम’ आणि महिला आरक्षण विधेयकावर भाष्य करताना राऊत यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले असून संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी घटकांसाठीही आरक्षणाची तरतूद असावी, असे त्यांनी सांगितले.

नागपूर काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, येत्या काळात पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: