आखाती प्रदेशातील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, पुढील काळात निर्माण होऊ शकणाऱ्या आर्थिक संकटासाठी सज्ज राहण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे.
मुंबई (Minister Convoy Issue) : आखाती प्रदेशातील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, पुढील काळात निर्माण होऊ शकणाऱ्या आर्थिक संकटासाठी सज्ज राहण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे. या आवाहनावर राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नेते जयंत पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
जयंत पाटील यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधानांचे आवाहन सर्वोच्च मानून सरकारनेही त्याच दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत. त्यांनी सूचवले की, मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून प्रत्येकाला केवळ एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेली प्रत्येक विनंती देशातील मध्यमवर्गीयांनी नेहमीच कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. थाळ्या वाजवण्यापासून दिवे लावण्यापर्यंतच्या सर्व आवाहनांना नागरिकांनी प्रतिसाद दिला. आता पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, मध्यमवर्ग त्यासाठीही तयार आहे. मात्र, अनेक मंत्री २० ते ३० वाहनांच्या ताफ्यासह फिरताना दिसतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“मध्यमवर्ग त्याग करण्यास तयार आहे, पण सत्ताधाऱ्यांनीही ‘राष्ट्र प्रथम’ या धोरणाची अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवावी,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वतःपासून सुरुवात करण्याची मागणी केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, सध्याच्या परिस्थितीवर बोलण्यास उशीर का झाला? तसेच, सरकार स्वतःच्या मंत्र्यांचे वाहनताफे कमी करणार का, असा सवालही त्यांनी केला.
याच संदर्भात, अमित सातम यांच्या ताफ्यावरूनही त्यांनी टीका करत, “स्वतःसोबत अनेक गाड्या असताना इतरांना काटकसरीचा सल्ला देणे योग्य आहे का?” असा टोला लगावला. तसेच, निर्णय प्रक्रियेत स्थानिक स्वायत्ततेऐवजी दिल्लीवर अवलंबून राहावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सध्या या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असून, ‘काटकसरी’च्या आवाहनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.