मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला.
'भाडे के टट्टू' शब्द मागे घेत 'सुपारीबाज' असा उल्लेख; मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या आधीच्या वक्तव्याचाही उल्लेख करत विरोधकांवर जोरदार टीका केली.
मिसिंग लिंक प्रकल्पावर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सरकारवर टीका करणाऱ्यांचा उल्लेख यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'भाडे के टट्टू' असा केला होता. या वक्तव्यावरून विरोधकांसह राज ठाकरे यांनीही तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्री यांच्या भाषेवर टीका केली होती. याच वादाला उत्तर देताना फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केली.
आपल्या भाषणात त्यांनी आधी वापरलेला 'भाडे के टट्टू' हा शब्द मागे घेत अधिक सुसंस्कृत शब्दप्रयोग करण्याची भूमिका मांडली. "मी अभ्यास करून तो शब्द मागे घेतो. त्याऐवजी 'भाटक गदर्भ' किंवा सोप्या भाषेत 'सुपारीबाज' हा शब्द वापरतो," असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'मिमिक्री आर्टिस्ट' असा केला. ते म्हणाले, "ते आमचे मित्र आहेत आणि राजकारणात असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. मात्र त्यांनी मिमिक्री किंवा स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रात करिअर केले असते, तर इतर कोणत्याही स्टँड-अप कॉमेडियनला बाजारपेठ उरली नसती."
मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवल्याचाही त्यांनी आरोप केला. प्रकल्पातील पूल आणि बोगद्यांबाबत चुकीचे दावे करत '७,००० कोटी रुपये पाण्यात गेले' असे सांगणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी असल्याचे त्यांनी नमूद केले. अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.
दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेसाठी विधानसभेचे कामकाज आदल्या दिवशी रात्री ३:३८ वाजेपर्यंत सुरू होते. या चर्चेत रोहित पवार, सुरेश धस, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह एकूण ३२ सदस्यांनी कायदा-सुव्यवस्था आणि शेतकरी प्रश्नांवर आपली मते मांडली.
यापूर्वी मुख्यमंत्री यांनी वापरलेल्या 'भाडे के टट्टू' या शब्दावर विरोधकांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री अधिक संयत आणि सुसंस्कृत भाषा वापरावी, अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी शब्दप्रयोग बदलत विरोधकांवर पुन्हा निशाणा साधला.