Aanvi Hunger Stike: शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आन्वी येथील हनुमान संस्थानसमोर आमरण उपोषण सुरू
३० मार्च २०२२ रोजी निष्कासित केलेल्या शासकीय गट क्र. १८९ व १९० मध्ये पुन्हा अतिक्रमण केल्याचा आरोप
ग्रामपंचायत प्रशासन व सचिवांच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप; हनुमान मंदिरासमोर ठिय्या
चिखली (Aanvi Hunger Stike) : चिखली तालुक्यातील मौजे आन्वी येथील शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज, सोमवार दिनांक १३ जुलै २०२६ पासून समस्त गावकऱ्यांच्या वतीने आन्वी येथील हनुमान संस्थानसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांना लेखी निवेदन सादर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आन्वी येथील शासकीय गट क्र. १८९ व १९० ही ई-क्लास जमीन दिनांक ३० मार्च २०२२ रोजी प्रशासनामार्फत निष्कासित (अतिक्रमणमुक्त) करण्यात आली होती. या जमिनीवरील काही भागात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला, तर उर्वरित जमीन गावच्या विकासकामांसाठी उपयोगात आणण्यासाठी ठेवण्यात आली होती.
ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीने पुनअतिक्रमण?
गावकऱ्यांनी निवेदनात आरोप केला आहे की, या राखीव शासकीय जमिनीवर वामन संभाजी घेवंदे व भीमराव घ्याणू घेवंदे यांनी पुन्हा बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायत सदस्य गजानन उत्तमराव पवार यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरने सदर जमिनीवर नांगरणी व वखरणी करून या अतिक्रमणाला प्रत्यक्ष मदत केली असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासकीय अनास्था आणि दुर्लक्ष
या पुनरतिक्रमणाबाबत आन्वी येथील सरपंच आणि ग्रामसेवक (सचिव) यांना गावकऱ्यांनी वेळोवेळी माहिती दिली. निष्कासित जमिनीवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, ही कायदेशीर जबाबदारी ग्रामपंचायतीची असतानाही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. तसेच ग्रामसेवक गावात फिरकत नसल्याने आणि तक्रारींची दखल घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी २० डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्राचीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
आजपासून आमरण उपोषणाचे हत्यार
वारंवार मागणी करूनही अतिक्रमण न हटवल्यामुळे अखेर समस्त गावकऱ्यांनी आज, १३ जुलै २०२६ पासून आन्वी येथील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर रमेश चांगदेव पवार, भगवान पांडुरंग सुरडकर, समाधान गुलाबराव पवार, प्रकाश एकनाथ पवार, अनिल ज्ञानेश्वर पाटील, विजय वामनराव ठेंग यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विविध कार्यालयांना प्रतिलिपि रवाना
सदर निवेदनाच्या प्रतिलिपि केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, आमदार श्वेताताई महाले पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (बुलढाणा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार चिखली, ठाणेदार चिखली आणि गट विकास अधिकारी (पंचायत समिती, चिखली) यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.