बीड जिल्ह्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे.
बीड (Married Woman Death) : बीड जिल्ह्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. विहिरीत आढळून आलेल्या महिलेच्या मृत्यूमागे सासरच्या मंडळींचा हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पती, सासरा आणि सासूविरुद्ध खून तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिला संध्या किसन घुले हिचा विवाह 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्यासोबत झाला होता. लग्नावेळी चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच संध्याला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जाऊ लागल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
"तू काळी आहेस, तुला स्वयंपाक करता येत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस," अशा शब्दांत तिचा अपमान करण्यात येत होता. याशिवाय ऑटो रिक्षा खरेदीसाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. वाढत्या छळाला कंटाळून संध्या काही काळ माहेरी राहिली होती. मात्र, दीड वर्षांच्या मुलाच्या भविष्यासाठी नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर ती पुन्हा सासरी परतली होती.
दरम्यान, 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरीच्या परिसरात आढळून आली. याबाबत सासरच्या मंडळींनी माहेरच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर विहिरीत शोधमोहीम राबविण्यात आली असता संध्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार झाल्याच्या गंभीर जखमा आढळल्या. तसेच हात-पायांवरही मारहाणीच्या खुणा असल्याचे समोर आले. यामुळे हा अपघाती मृत्यू नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला.
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासरा आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली असून सासूचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यात घडलेल्या तत्सम घटनेनंतर पुन्हा एकदा विवाहितेच्या छळातून मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.