Congress Harshvardhan Sapkal: विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विचारांशी गद्दारी करून कमिशन आणि खोक्यांसाठी पलायन केलेल्या खासदारांना विकासावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही
हिंगोली (Congress Harshvardhan Sapkal) : विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विचारांशी गद्दारी करून कमिशन आणि खोक्यांसाठी पलायन केलेल्या खासदारांना विकासावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र हल्लाबोल केला. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी विकास कामांसाठी शिंदे गटात जाण्याच्या भूमिकेवर सपकाळ यांनी भाष्य केले. विकास महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी व्यवस्थेने आश्वस्त केले आहे. मात्र विकास होत नसेल तर अनुशेष हा देखील निर्माण होण्याचा एक मापदंड सरकारकडे असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र हा विषय विकासाचा नसून गद्दार खासदारांना मिळणाऱ्या कमिशन, पैसा आणि खोक्यांचा आहे, असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला. विकासाचे नाव पुढे करून जो स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करतो तो केविलवाणा प्रयत्न आहे. गद्दारी ही गद्दारीच असते. धोका हा धोकाच असतो. यावर तुम्ही कोणताही विकासाचा मुलामा दिला तरी तुमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम राहील, असे ते म्हणाले.
सध्याच्या सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, एवढे विकासपुरुष ‘बदबद’ पैदा झाले आहेत. मात्र विकासाऐवजी भ्रष्टाचार आणि अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परीक्षा आहे पण पेपर फुटत आहेत. तरुणांकडे पदव्या आहेत पण रोजगार नाहीत. शेती आहे, शेतमाल आहे पण त्यांना भाव नाही. शेतकऱ्यांवर प्रचंड कर्ज आहे परंतु कर्जमाफी नाही. अशा परिस्थितीत सरकारने देशभरात गोंधळ निर्माण केला आहे. हा गोंधळ सोडवणे प्राधान्याचे आहे. त्यामुळे विकासाच्या बाता करणाऱ्या सरकारने आणि विकासाच्या नावाखाली गद्दारी करणाऱ्या खासदारांनी बोलू नये, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.