मानोरा नगर पंचायतचे मुख्याधिकारी उमेश राठोड यांच्या निष्क्रीय कारभाराविरोधात नगर पंचायत पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
निलंबनाची मागणी, मुख्याधिकारी हरविले आहेत; नागरिकांनी रिकाम्या खुर्चीला घातला फुलाचा हार!
मानोरा (Manora Nagar Panchayat) : मानोरा नगर पंचायतचे मुख्याधिकारी उमेश राठोड यांच्या निष्क्रीय कारभाराविरोधात नगर पंचायत पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने शहरातील विकासकामे ठप्प झाली असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी अर्जाद्वारे नगर पंचायतचे पदाधिकारी व नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.
नागरिकांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, सप्टेंबर २०२५ पासून उमेश राठोड मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत. मात्र, तेव्हापासून नगर पंचायतची सर्व विकासकामे पूर्णपणे रखडली आहेत. मुख्याधिकारी कामे करण्यास टाळाटाळ करतात व कोणतीही नवीन विकासकामे हाती घेत नाहीत. त्यांच्या येण्या - जाण्याची वेळ निश्चित नसून, कार्यालयात आल्यानंतरही ते केबीन आतून बंद करून एकटेच बसून राहतात. नागरिकांना भेटत नाहीत व समस्या सोडवत नाहीत.
घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्यासही मुख्याधिकारी टाळाटाळ करत असल्याने शासनाचा गरीबांना हक्काचे घर देण्याचा उपक्रम थांबला आहे. मागील नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे नागरिक भौतिक सुविधांपासून वंचित असून, पायाभूत समस्यांचे निवारण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मानोरा नगरपंचायत हद्दीतील अनेक विकासकामे ठप्प पडल्याने समस्यांचे ग्रहण लागले आहे. मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. तसेच, यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही अर्जात नमूद केले आहे. निवेदनावर अतिक अहेमद खान, इरफानशाह जमीलशाह, संजय भोरकडे, हेमेंद्र ठाकरे, मोहम्मद सोहेल अ. गनी अन्सारी, अमित सोनिवाल, गोपाल पिंपळकर, गणेश वाघमारे, मो अकिब पोपटे, शेख सुलेमान शेख तुराब, विजय वजीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता जिल्हाधिकारी या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण मानोरा शहराचे लक्ष लागले आहे.