Chikhli ST Corporation: हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर एकाच वेळी वृक्षारोपण करण्याचे आदेश महामंडळाने दिले होते.
पाच 'जिजाऊ' बसचे लोकार्पण
चिखली (Chikhli ST Corporation) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त १४ जुलै रोजी राज्यभर सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी वृक्षारोपण करण्याचे आदेश महामंडळाने दिले होते. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व आगार, बसस्थानके व विभागीय कार्यालयांमध्ये स्थानिक हवामानास अनुरूप वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या निर्देशानुसार (Chikhli ST Corporation) चिखली आगारात आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते २०० वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी सुरेश अप्पा कबुतरे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, नगरपालिकेचे पदाधिकारी सुहास शेटे , राणा सुरेंद्रसिंह ठाकुर ,दत्ता सुसर, राम बनसोडे ,आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, हरिष नागरे, सागर परदेशी, बद्रीनाथ महाले, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आगारातील कर्मचारी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी आमदार महाले पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.

याच कार्यक्रमादरम्यान चिखली आगारात उभारण्यात येणाऱ्या सीएनजी गॅस स्टेशनसाठी काही वृक्षांची तोड आवश्यक असल्याने निर्माण झालेल्या वादावरही तोडगा निघाला. वृक्षप्रेमी रेणुकादास मुळे यांनी वृक्षतोडीला आक्षेप घेत तक्रार केली होती. त्यानंतर आगार व्यवस्थापक जोगदंड यांनी इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करत शासनाच्या हरित वाहतूक धोरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी रेणुकादास मुळे यांनी, "वृक्षतोड करायचीच असेल तर त्याच्या बदल्यात दुप्पट झाडे लावली पाहिजेत," अशी अट घातली. त्यानुसार चिखली आगारात २०० आणि देऊळगावराजा-अमरापूर उपआगारात २००, अशी एकूण ४०० वृक्षांची लागवड करण्याचे आश्वासन आगार प्रशासनाने दिले. त्याचबरोबर रेणुकादास मुळे यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर त्यांनी वृक्षतोडीबाबतची तक्रार मागे घेतल्याची घोषणा केली.
यानंतर चिखली आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच 'जिजाऊ' बसचे लोकार्पण आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणानंतर आमदार महाले पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नव्या जिजाऊ बसमधून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत प्रवास केला आणि नागरिकांना एसटीच्या आधुनिक बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
बसस्थानकावर आमदार महाले पाटील आल्या असता अनेक महिला प्रवाशांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. अनेक महिलांनी आमदारांसोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार महाले पाटील यांनी महिला प्रवाशांकडून त्यांच्या भागातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला. त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झाले.