Dr. Hansraj Vaidya: महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली. त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेण्याची आग्रही मागणी केली.
Dr. Hansraj Vaidya |
पुरोगामी महाराष्ट्रात ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे खेदजनक: 'फेस्कॉम'ची आक्रमक भूमिका
नांदेड (Dr. Hansraj Vaidya) : “शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणासह केरळ, गोवा, दिल्ली आणि झारखंड या राज्यांच्या विधिमंडळात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस आणि कल्याणकारी निर्णय घेतले जाऊ शकतात, तर पुरोगामी महाराष्ट्रात असे निर्णय का होत नाहीत?” असा थेट सवाल ज्येष्ठ नागरिक फेडरेशन (फेस्कॉम) चे उत्तर मराठवाडा प्रांत अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य (Dr. Hansraj Vaidya) यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांसाठी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेण्याची आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
डॉ. वैद्य यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आणि संतांच्या परंपरेचे राज्य आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या या राज्यात प्रत्यक्षात मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आपण 'एक देश, एक संविधान आणि समान न्याय' अशी भाषा करतो, पण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही तत्त्वे अमलात येताना दिसत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या ज्येष्ठ नागरिकांनी तरुणपणी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि पुढील पिढी घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, अशा व्यक्तींना आज आपल्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलने करावी लागत आहेत. ही बाब लोकशाहीसाठी लांच्छनास्पद असल्याची खंत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली. इतर राज्यांमध्ये ज्येष्ठांसाठी आर्थिक सहाय्य, आरोग्य सुविधा आणि सन्मानाने जगण्याचे अधिकार सुनिश्चित केले जात असताना, महाराष्ट्रात मात्र अपेक्षित संवेदनशीलता दिसून येत नाही, अशी टीका त्यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून एखादा अद्वितीय निर्णय घ्यावा, असे आवाहन डॉ. वैद्य (Dr. Hansraj Vaidya) यांनी केले आहे. हा निर्णय केवळ धोरणात्मक नसून सामाजिक न्यायाच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मानधनासह तातडीच्या उपाययोजनांची मागणी
राज्यातील विस्थापित, आदिवासी, निराश्रित, निराधार, गरीब, वंचित शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने तातडीने मानधनासह ठोस उपाययोजना कराव्यात. समाजातील या घटकाला सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आत्मनिर्भरतेने जगता यावे, यासाठी सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, अशी मागणी डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे.