सर्व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना १५ जून २०२६ पूर्वी नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हिंगोली (Maharashtra Police) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलीस दलातील ११३ पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यासंदर्भात २२ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातून आदेश काढण्यात आले असून, सर्व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना १५ जून २०२६ पूर्वी नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील तरतुदीनुसार तसेच जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या २२ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या व प्रशासकीय बदलीपात्र असलेल्या पोलीस अंमलदारांचा त्यांची पसंती, नियम व प्रशासकीय निकड विचारात घेऊन बदल्यांसाठी विचार करण्यात आला आहे.
या बदली आदेशात पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर सरोदे यांची गोरगाव पोलीस ठाण्यातून एटीबी हिंगोली येथे, सटवा दिघाडे यांची पोमु हिंगोली येथून कळमनुरी पोलीस ठाण्यात, गजानन बर्गे यांची पोमु हिंगोली येथून बासंबा पोलीस ठाण्यात तर प्रकाश आप्पाले यांची हिंगोली शहर पोलीस ठाण्यातून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तसेच संदीप जाधव यांना पोमु हिंगोली येथून स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली येथे, भीमराव राठोड यांना वसमत शहर येथून वसमत ग्रामीण येथे, सुरेश आडे यांना हिंगोली शहर येथून पोमु हिंगोली येथे आणि तुकाराम केंद्रे यांना कळमनुरी येथून हत्ता पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. देविदास सूर्यवंशी यांची कळमनुरी येथून पोमु हिंगोली येथे तर किशन राठोड यांची हिंगोली शहर येथून वसमत शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ जून २०२६ पूर्वी नवीन ठिकाणी कार्यमुक्त करावे. अन्यथा त्यांना या कार्यालयाकडून स्थित कार्यमुक्त करण्यात येईल आणि संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
तसेच बदलीनंतर जे अंमलदार रजा घेतील किंवा गैरहजर राहतील त्यांना रजा निवेदनाच्या तारखेपासून स्थित कार्यमुक्त करण्यात येणार आहे. बदलीच्या ठिकाणी अंशतः बदल करणे, बदली रद्द करणे किंवा बदलीस स्थगिती देणे अशा प्रकारच्या विनंत्या कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्या जाणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पदग्रहण अवधीत बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झाल्यास तो कालावधी अकार्यदिन म्हणून गणला जाईल. तसेच बदलीपूर्वी सर्व तपास, गुन्हे, वरिष्ठ अर्ज व इतर प्रलंबित प्रकरणे प्रभारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊनच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.