मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकारणातील संभाव्य भूमिकेबाबत गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा; गिरीश महाजन यांच्या ‘ट्रॅक रेकॉर्ड’वरही राऊतांची टीका
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकारणातील संभाव्य भूमिकेबाबत गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात गेल्यास महाराष्ट्राची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येऊ शकतात, असे आपले राजकीय आकलन असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राज्याचे हित जपणाऱ्या, महाराष्ट्राला योग्य दिशेने नेणाऱ्या आणि राज्याचा स्वाभिमान कायम ठेवणाऱ्या व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत – राऊत
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता संजय राऊत यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करता, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वाधिक योग्य नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले.
बावनकुळे यांचा सर्वांशी चांगला संवाद असून, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा १०० टक्के विचार होईल, असा दावा त्यांनी केला.
इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हेच बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करतील, असे आपले स्पष्ट राजकीय आकलन असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांच्या नावावर राऊतांची टीका
मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत गिरीश महाजन यांच्या नावाबाबत विचारले असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. “गिरीश महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे,” असे म्हणत त्यांनी महाजन यांच्या संभाव्य दावेदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सिद्धिविनायक मंदिराच्या निधीवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप
संजय राऊत यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या निधीच्या वापरावरूनही सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात आदेश बांदेकर अध्यक्ष असताना मंदिराच्या निधीचा सामाजिक कार्यासाठी अत्यंत चांगला वापर करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
मात्र, सत्ता बदलल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या डायलिसिस केंद्रासाठी असलेला निधी नव्या अध्यक्षांनी रद्द केल्याचा आरोप राऊत यांनी केला. संबंधित व्यक्तीने पक्षात प्रवेश केल्यासच निधी मंजूर केला जाईल, अशी अट घालण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
‘रामरक्षा आंदोलना’चा दुसरा टप्पा १८ जुलैला नागपुरात
अयोध्या राम मंदिरातील कथित लुटीच्या प्रकरणावरून देशात असंतोष असल्याचे सांगत मुख्य आरोपी अद्याप पकडले गेले नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या कथित लुटमारीविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’चा दुसरा टप्पा १८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विदर्भातील रामप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.