Hingoli Zilla Parishad: मागील बारावर्षांपासून रिक्त असलेल्या ३२ जिल्ह्याप्रमुख पदाचे भरल्याने शिकषकांना न्याय मिळाला. या पदाची यादी १२ वर्षानंतर देण्यात आली, जिल्हा परिषदने पदभरतीत अनुकूल काळ निवडला.
मागील बारा वर्षापासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखाच्या ३२ जागा भरल्याने केंद्रप्रमुख पदाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांना मिळाला न्याय
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या सतत पाठपुराव्याला मिळाले यश
हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : मागील १२ वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या ३२ जागा भरल्यामुळे केंद्रप्रमुख पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रीय शाळेत केंद्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी १९९५ मध्ये एक केंद्रप्रमुख हे पद निर्माण करण्यात आले होते. परंतु मागील १० ते १२ वर्षांपासून जिल्ह्यात जवळपास ६५ केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त होत्या. या रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार केंद्रातील सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकांकडे देण्यात आला होता. केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त असूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून त्या पदोन्नतीने भरण्यात न आल्याने अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त होत होते.
संघटनेच्या वतीने मागील वर्षी २०२५ ला सतत पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ऑगस्ट २०२५ मध्ये पदोन्नतीने ३१ जागा भरल्या होत्या. विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरायच्या ३४ केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त होत्या. विभागीय स्पर्धा परीक्षा ३ व ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती, परंतु काही शिक्षक न्यायालयात गेले होते. त्यामुळे अंतिम निवड यादी व पदस्थापना रखडल्या होत्या. न्यायालयाने २६ मे २०२६ रोजी निर्णय देऊन ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत त्यांना केंद्रप्रमुख गुणवत्ता यादीत पात्र ठरवले होते. शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना केंद्रप्रमुख गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून गुणवत्तेनुसार पदस्थापना देण्याचे आदेशित केले होते. राज्यात इतर जिल्ह्यांत केंद्रप्रमुख गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्या होत्या.
परंतु हिंगोली जिल्हा परिषद (Hingoli Zilla Parishad) शिक्षण विभागाकडून केंद्रप्रमुख अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली नव्हती व पदस्थापना देण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई होत होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा दिलेले शिक्षक सतत जिल्हा परिषदेकडे पायपीट करत होते. शिक्षण विभागाकडून कागदपत्र तपासणी होऊनही अंतिम यादी प्रसिद्ध होत नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या व पात्र ठरलेल्या शिक्षकांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची मागणी केली होती.
विधानपरिषदेची निवडणूक संपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने २३ जून २०२६ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून गुणवत्ता व सेवा ज्येष्ठतेनुसार ३२ शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणजेच केंद्रसमन्वयक म्हणून पदस्थापना दिल्या आहेत. २ जागा रिक्त असून त्या दिव्यांग शिक्षकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दिव्यांग शिक्षक विभागीय स्पर्धा परीक्षा गुणवत्ता यादीत आहेत, परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याने त्यांना पदस्थापना देण्यात आल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण ६८ केंद्रे असून मागील वर्षापासून पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे ६६ केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरल्यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे भरली गेली आहेत. त्यामुळे अतिरिक्त पदभार असलेल्या सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी झाला आहे. जिल्ह्यात कायमस्वरूपी केंद्रप्रमुख पदे भरल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
केंद्रप्रमुख पदासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची प्रतीक्षा संपली असून पदोन्नतीचा लाभ मिळाल्याने त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. पदोन्नती मिळाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने व जिल्हा परिषद प्रशासनाने केंद्रप्रमुख पदे समुपदेशन पद्धतीने भरून पात्र शिक्षकांना न्याय दिला. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे व पदस्थापनेची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर, जिल्हा सरचिटणीस माधव वायचाळ, डॉ. बालाजी जबडे, रमेश गंगावणे, परसराम हेंबाडे, विकास फटांगळे, अंगद साबणे, हरण्णाप्पा बरगळ, रामराव वराड, महेबूब शेख, किशन घोलप, शंकर सरनाईक यांसह इतरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.