Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

Maharashtra Cabinet Expansion

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; दिल्ली दौऱ्यापूर्वी एकनाथ शिंदेंची सर्व कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्या तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग दिल्ली दौऱ्यापूर्वी एकनाथ शिंदेंची सर्व कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक

Maharashtra Cabinet Expansion |

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत; केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळ नियुक्त्यांवर होणार चर्चा, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

मुंबई : राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच राजकीय घडामोडींना वेग आला असून, राज्यासह केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्ली दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली असून, सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्या तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडीनंतर शिंदे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

नंदनवन बंगल्यावर आयोजित बैठकीत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सहभागी झाले आहेत. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच राज्यातील रखडलेल्या महामंडळ नियुक्त्या, संघटनात्मक बदल आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल यावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत पक्ष नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल किंवा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

एकनाथ शिंदे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार असून दुपारनंतर ते दिल्लीत दाखल होणार आहेत. दिवसभर विविध बैठका आणि चर्चांमध्ये सहभागी झाल्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेला असतानाच शिंदे यांच्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवरही दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांनी निशाणा साधला.

"हे शहाणपण त्यांना खूप उशिरा सुचले आहे. त्यांचा नेहमी बाहेरून पाठिंबा असतो. 'तुम्ही लढा, आम्ही बाहेरून कपडे सांभाळतो' अशी त्यांची भूमिका असते. बुडाला आग लागली असताना डोंगराची आग विझवायला जाण्यासारखा हा प्रकार आहे," अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सरकारविरोधात कोणतेही आंदोलन झाले की त्याला पाठिंबा देण्याची भूमिका विरोधक घेतात. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी विरोधक केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी अशा विषयांचा वापर करत असल्याचा आरोप केला.

देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा करत, ८० हजार लोकांना अन्नधान्य पुरविण्यात येत असल्याचे तसेच ३२ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related to this topic: